अनुभव - 31
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव 31 🌺 )
* गुरु योग्य असल्यावरी वाया न जाई सेवा खरी *
जय गजानन! 'चमत्कारा शिवाय नमस्कार नाही ' ही म्हण अत्यंत सार्थ आहे. चमत्कार जाणवला तरच नमस्कार करण्याची जगाची रीत आहे हेही खरे आहे. पण नमस्कार करता करता चमत्कार जाणवला तर होणारा नमस्कार अधिक भावपूर्ण झाल्याशिवाय राहत नाही हेही तितकंच खरं आहे.
गजानन महाराजांना नमस्कार करण्यास ,मी केव्हा प्रारंभ केला मला आठवतं नाही. माझ्या घरी असं काही वातावरण नव्हतं की मी गजानन महाराजांच्या संपर्कात यावं, हां पण एवढं मात्र निश्चित की ज्या भागात मी राहिलो,तो प्रदेश मात्र त्यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेला आणि त्यात धन्यता मानणारा प्रदेशआहे. अमरावतीच्या जवळ बडनेरा येथे माझं राहणं. पोथीत म्हटलं आहेच ....
महाराज शेगांवासी आले/परी न स्थीर राहीले/हमेशा ते भटकत फिरले/मनास येईल त्या स्थळा/ अकोट अकोले मलकापूर/नावे सांगावी कुठवर?/.. शेगांव,आकोट, अमरावती. किंवा शेगांव,अकोला,अमरावती. हा तो पट्टा आहे की जिथे महाराजांनी अनेक वेळा भटकंती केली, त्यामुळे त्या भागातील रहिवाशांकडून 'गजानन महिमान ' ऐकण्याचे भाग्य मला लाभले आणि त्यातून गजानन विजय ग्रंथाचा परिचय होऊन शेगांवच्या वार्या सुरू झाल्या.
बडनेरा हे मुख्य रेल्वे लाईनवर येतं त्यामुळे मनात येईल तेव्हा शेगांवला जाणे हा छंदच लागला होता. घरची आर्थिक स्थिती यथातथाच होती पण तेव्हा तिकीटही अगदी अल्प होतं. कधी मित्रही तिकीट काढून घ्यायचे त्यामुळे मित्रांसोबत शेकडो वेळा शेगांवला जाणं झालं होतं. आमच्या प्रवासात अनेक वेळा आमच्या बोलण्याचा विषय असायचा 'पायी वारी '. लोक 'आषाढी 'ला एवढे दूरदूरून पायी वारीत हजेरी लावतात आणि पंढरीचा कळस पाहून समाधान पावतात,पोथीत पुंडलिक भोकरे पायी वारीला जात असा उल्लेख आहे,बडनेरा-शेगांव साधारण 134 कि.मी. अंतर आहे. आपण पायी वारी करावी का?असा विषय चर्चेला असायचा आणि एक दिवस आम्ही तीन मित्रांनी हे प्रत्यक्षात आणण्याचं ठरविलं
मी स्वतः, मोती नगर अमरावतीचा माझा मित्र किशोर देशमुख आणि अजून एक मित्र,असे आम्ही तिघे 9 जाने.2005 रोजी सकाळी बडनेरा येथून शेगांव साठी पायी वारीला निघालो. आम्हा तिघांनाही पायी चालण्याचा अनुभव असा नव्हताच. वाटेत जिथे संध्याकाळ होईल तिथे थांबायचं,फक्त अकोला येथे किशोरची बहीण असल्यामुळे तिथला मुक्काम तेवढा मनात होता,बाकी 'महाराज करवून घेतील 'ह्या विश्वासाची शिदोरी सोबत होती.
पहिल्या दिवशी उत्साहाने चालण्यास प्रारंभ केला,आपसात गप्पा करीत वाटचाल सुरु होती. अशा वेळी मौन ठेवून नामस्मरण केले तर पुण्यसंचय होऊन शक्तीचा व्यर्थ अपव्यय टळतो,याची कल्पना तेव्हा नव्हती त्यामुळे दुपार टळता ,टळता,तिघांनाही कमालीचा थकवा तर जाणवू लागलाच पण तिघांच्याही पायाला चांगलेच फोड आले आणि पाउल पुढे टाकणे कठीण झाले .मधापुरी नामक गावाला आम्ही पोहोचलो होतो,तिथे एक लहरी बाबा मठ दिसला त्यांनी आमच्या विश्रांती आणि भोजनाची सोय केली.
मात्र दुसर्या दिवशी आम्ही जेव्हा पुढे जाण्याचा निर्णय घेतला,आमच्या तिसर्या मित्राने माघारी परतण्याचा निर्णय घेतल्यामुळे ,मी आणि किशोर आम्ही दोघेच शेगांवच्या दिशेने पुढे निघालो.
रात्रभराच्या विश्रांतीमुळे थकवा थोडा कमी झाला होता पण पायांची अवस्था गंभीर झाली होती. पाउल टेकवणं कठीण होतं. कसं बसं काही कि.मी.अंतर चाललो तर एक धाबा दिसला आणि त्या धाब्यावर एका छोट्या खोपट्यात एक शिंपी दुकान थाटून बसला होता. तिथे चिंध्यांचा ढीग पाहून मित्राच्या डोक्यात एक कल्पना आली त्या नुसार आम्ही त्या शिंप्याला चिंध्या देण्याची विनंती केली,त्याने त्या सहज देऊ केल्या,मग आम्ही नाडी आणि लांब चिंधीच्या सहाय्याने दोन्ही पायांना त्या चिंध्या बांधल्या,ते रूप दिसायला खूप विचित्र दिसत होतं.आम्ही गावात असतो तर मुलांनी आम्हाला चिंधी वाले बाबा म्हणून चिडवलं असतं इतकं ते हास्यास्पद होतं. पण त्या चिंध्यांच्या सहाय्याने आमचं मार्गक्रमण पुढे सुरू झालं,पाय त्रास देत होते पण आता मनाच्या खंबीरतेने शरीराच्या वेदनांवर विजय मिळविला होता,गजानन महाराजांचं स्मरण आणि शेगांवचं दर्शन ,दोनच गोष्टी महत्वाच्या होत्या.
मुर्तिजापूर साधारण तीन कि. मी. वर आलं असेल,रस्त्याच्या बाजूला मातीचं पठार आणि तिथे गर्द छायेचं कडुलिंबाचं झाड होतं,थोड्या विश्रांती साठी आम्ही तिकडे वळलो. झाडा खाली एक ऐंशी च्या वयातील खेडवळ म्हातारेबाबा बसले होते. त्यांनी विचारलं 'कोठं चालले?'म्हटलं शेगांवला ! गजानन बाबाच्या दर्शनाला? त्यांचा प्रश्न. मग विचारलं ,पायाला कपडे काऊन बांधले? म्हटलं पायी वारी करतो आहे,चालून पायाला फोड आलेत.बडनेर्याहून येतो आहे. म्हणाले,'बाप्पा इतक्या दूरून?.'कायले शरीराची काहिली करून राहिले बापा हो ' .यानं कां देव भेटतो कां? अरे माय बापाची सेवा करावी,'मानुसकीनं वागावं 'देव त्यानं खूष होतो. माहं ऐकान तर घराकडे परत जा. पायाला दवापानी करा. दोन दिवसात पाय ठीक होऊन जाईन. देहाचे हाल अन् देवाची प्राप्ती याचा काही संबंध नाही राजे हो. 'देव अंतरात ठेवा लागते. त्याचं नामस्मरण करा लागते. मन शुध्द असन तिथे देव राहते.' एवढं बोलून आमच्याकडे पाहिलं,त्यांच्या नजरेत वात्सल्य ओतप्रोत भरलं होतं. आम्ही उठलो त्यांना नमस्कार केला,म्हटलं येतो आम्ही. त्यानी विचारलं,मग?कोठं चालले?आम्ही म्हटलं शेगांवला त्यावर म्हणाले आता तुमची मर्जी. त्यांनी आशीर्वाद दिला 'गजानन बाबा तुमचं भलं करो !'
आम्ही शेगांवच्या दिशेने पुढे निघालो. बघता बघता मुर्तिजापूरच्या वेशीवर येऊन पोहोचलो. मित्र म्हणाला,गावात शिरण्या आधी चिंध्या काढून घेऊ,एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो,दोघांनीही चिंध्या काढल्या आणि दोघांचीही नजर मागे तीन कि.मी. वर काही दिसतं का यासाठी वळली पण इतक्या मागे पहाण्याची दिव्यदृष्टी आमच्या जवळ नव्हती. आम्ही डोळे विस्फारून एकमेकांकडे पाहू लागलो. दोघांचेही पाय पूर्ण ठीक झाले होते.
पुढील दोन दिवसात पायी चालत असतानाच नामस्मरणाचा आम्हाला मिळालेला सल्ला आम्ही आचरणात आणला आणि अतिशय समाधानी वृत्तीने आमची वारी पूर्ण झाली.
आज त्या घटनेला खूप वर्ष होऊन गेलीत. आता ती जागाही तशी राहिली नाही पण आजही तिथून जाण्याचा कधी योग आला तर वेडं मन ते कडुलिंबाचं झाड कुठे दिसतं का आणि त्याखाली कुणी आहे का?हा शोध घेत रहातं,मग लगेच म्हातारेबाबांचा सल्ला आठवतो 'नामस्मरण करा ' अन् जप सुरू होतो..श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺 अनुभव-- मिलिंद भिडे बडनेरा
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
आपल्याजवळगजाननमहाराजांविषयीकाहीअनुभवअसल्यासस्वागतआहे.
Comments