top of page

अनुभव - 38

Updated: Jun 6, 2020

"श्री "

गजानन महाराज की जय

* जैसे करशील तैसे करी,परी दया असू दे अंतरी *


जय गजानन! नाशिक येथील पंचवटी काळाराम मंदिराजवळ माझं आजोळ.तिथेच माझं बालपण गेलं. काहीही समजण्याचं वय नसतं इतक्या लहानपणी आजी कडून गजानन विजय ग्रंथातील गोष्टी ऐकल्या. त्यामुळे आजी आणि गजानन महाराज माझ्यासाठी श्रद्धेच्या गोष्टी होत्या.

1971 ची घटना,मी पाचव्या वर्गात होते. 26 जानेवारीला शाळेतील मोठ्या वर्गातील मुलींचा पोलीस परेड ग्राउंडवर कार्यक्रम होता .आमच्या शाळेतील कार्यक्रम सकाळी आठ वाजता संपल्यावर सर्व मुलींना तिकडे नेण्यात आले,मी व माझी एक मैत्रीण राधा आम्ही दोघी शाळेच्या गणवेषात मोठ्या मुलींच्या मागे मागे पोलीस परेड ग्राउंड वर जाऊन पोहोचलो. तो कार्यक्रम संपल्यावर तिथून परत येताना सी.बी.एस.कोर्टाजवळ मोठा रस्ता क्रॉस करीत असताना,मैत्रिणीचा हात सुटून ती पलीकडे पोहोचली,पण मी भर रस्त्यात असतानाच समोरून येणार्या ट्रकचा धक्का मला लागला. माझ्या तोंडून तेव्हा फक्त 'आजी','गजानन महाराज' असे दोन शब्द बाहेर पडले. शाळेचे एक शिक्षक देवघरे यांचं लक्ष जाऊन त्यांनी मला बाजूला केलं आणि मी बेशुद्ध झाले. मला शाळेत नेण्यात आलं,तिथे काही वेळाने मी शुद्धीवर आले तेव्हा बाजूला असणारे शिक्षक आपसात म्हणत होते 'ही वाचली कशी हे खरोखर आश्चर्यच आहे.' ते वाक्य माझ्या मनावर कोरल्या गेलं आणि सोबत कोरल्या गेलं गजानन महाराजांचं नाव .

1982 साली माझं लग्न झालं आणि मी सौ.शीतल शरद करंदीकर झाले. माझे मोठे दीर खामगाव येथे असल्यामुळे आणि खामगाव-शेगांव अंतर जेमतेम सोळा, सतरा कि.मी. त्यामुळे अनेकदा शेगांवला जाण्याची संधी मिळाली. तिथून मूर्ती आणून घरी तिची प्राणप्रतिष्ठा झाली.

महाराजांनी जीवनात विविध अनुभव दिलेत आणि कठीण प्रसंगात जीवनातील सत्याला सामोरे जाऊन खंबीर पणे उभं राहण्याची शक्तीही दिली. महाराजांनी एका अनुभवातून मला शिकवलं,सत्याला सामोरं जावंच लागतं. सत्याला पाठ फिरवून नाही जगता येणार. तो अनुभव दुःखद आहे,गंभीर आहे,पण जीवनात कठीण प्रसंग आलेच तर खंबीर पणे लढा हे सांगणारा आहे.

माणसाला कधी कधी सूचक स्वप्न पडतात. ते स्वप्न जर सुखद असेल तर आपल्याला आल्हाददायी वाटतं पण ते जर विपरीत असेल तर आपण अस्वस्थ होतो. संतांसारखं आपल्याला त्याकडे समबुध्दीने नाही पाहता येत. आपण त्याकडे साक्षीभावाने नाही पाहू शकत.

मला तीन मुली आहेत. इ.स.2000 ची गोष्ट. माझी मोठी मुलगी तेव्हा बारावी सायन्सला होती. 1 मार्च च्या सुमारास तिची परीक्षा सुरू होणार होती. तो फेब्रुवारीचा मध्य असावा,एका रात्री मला स्वप्न पडलं. स्वप्नात मी पाहीलं की मिस्टरांनी भगवे कपडे परिधान केले आहेत ते शांत बसले आहेत आणि मला ते ओळखत नाहीत,मी मुलींना बोलावून समोर उभं केलं तर त्यांनी मुलींनाही ओळखलं नाही. ते स्वप्न पाहून मी अस्वस्थ झाले. मिस्टरांना सांगितल्यावर ते कदाचित मनातून काही समजले पण जाऊ दे लक्ष देऊ नकोस असं मला म्हणाले. चार दिवस बेचैनीत गेल्यावर मी गजानन महाराजांना प्रार्थनापूर्वक म्हटलं. काय समजावा मी याचा अर्थ?काय होणार आहे?तुम्ही जे मार्गदर्शन कराल तसं वागण्याचा मी प्रयत्न करीन. दुसर्याच रात्री मला स्वप्न पडलं. गोदावरी नदीच्या काठावर मी आणि मिस्टर पाण्यात पाय सोडून बसलो आहोत,माझ्या पायाला सापानी वेढा घातला आहे. मी मिस्टरांना ते दाखविलं आणि ते काढा अशी खूण केली पण ते शांतपणे बघत राहिले आणि मीच मग तो वेढा बाजूला केला. याचा अर्थ सरळ होता. महाराजांनी जणू सुचवलं की येणार्या संकटाला खंबीर पणे तोंड दे. तुझ्या अडचणी तुलाच दूर करायच्या आहेत. एकटीला. सकाळी उठल्यावर नित्य प्रार्थनेसोबत एकच वाक्य महाराजांना बोलले 'सांभाळून घ्या. '

मार्च महिना सुरू झाला,मुलीची बारावीची परीक्षा सुरू झाली. यांना अचानक ताप आला जोरदार कावीळ झाली,दुःख विकोपाला गेलं. दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं डाॅक्टरांना नीट निदान कदाचित झालं नाही,मुलीचा तिसरा पेपर होता त्याच्या आदल्या रात्री हे खूपच सिरीयस झाले. आम्ही सर्व रात्री दीड वाजेपर्यंत दवाखान्यात होतो. मोठी मुलगी 'उत्तरा 'घरी पेपरचा अभ्यास करीत होती. मला रात्री थोडी विश्रांती घे म्हणून नातेवाईकांनी घरी पाठविलं. मी उत्तराला म्हटलं आता अभ्यास बाजूला ठेवून थोडी विश्रांती घे. आम्ही दोघी अंथरुणावर विसावलो. मला थोडीबहुत कल्पना आली होती. मी गजानन महाराजांना आम्हा सर्वांसाठी बळ मागत होते. मुलीने डाॅक्टर व्हावे ही तिच्या वडिलांची इच्छा त्यांच्या जिवंतपणी पूर्ण होईल का?असं मोठ्ठं प्रश्न चिन्ह नजरेसमोर नाचत असतानाच दवाखान्यातून पहाटे निरोप आला,सर्व संपलं होतं. महाराजांनी पूर्व सूचना दिलेल्या संकटाला सामोरं जाणं आता भाग होतं.

उत्तराचा सकाळी अकरा वाजता पेपर होता,तिला सर्वांनी विचारलं 'उत्तरा' काय करायचं? उत्तराचं उत्तर ऐकून मलाही थोडा धीर आला ती म्हणाली, मी डाॅक्टर व्हावं ही दादांची इच्छा होती. अभ्यास करून परीक्षा देणं आणि डाॅक्टर होणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. सकाळी सर्व सोपस्कार पूर्ण करायचे नंतर मी पेपरला जाणार. तिच्या निर्णयाचा सर्वांनी मान राखला. मी मनातून गजानन महाराजांजवळ तिच्यासाठी शक्ती मागितली.

उत्तरा त्या परीक्षेत उत्तम पास झाली,नव्हे ती काॅलेज मधून पहिली आली, पुढे ती डाॅक्टर झाली.आज माझ्या तीनही मुली चांगल्या पध्द्तीने शिक्षण पूर्ण करून त्यांच्या घरी आहेत. दैव योगाने घडणारी गोष्ट जर टळूच शकत नसेल तर महाराजांनी त्याची पूर्व सूचना देऊन ते भोगण्याचं धैर्य दिलं ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते.मग आपण एखाद्या पिडीताला गजानन महाराजांचा धावा करायला सांगतो आणि त्याचा त्याला फायदा होतो तेव्हा त्याच्या नकळत त्याने ती आपल्या वेदनांवर घातलेली समाधानाची फुंकर ठरते.

मी ज्या शाळेत शिक्षिका आहे तिथे माझ्या सोबत माझी एक मैत्रीण होती,तिला संधिवाताचा खूप त्रास होता इ.स.2009 च्या सुमारास तो त्रास इतका वाढला की तिला उठणे,बसणे,चालणे सर्वच कठीण होऊन बसले. मी तिला भेटायला हाॅस्पिटलला गेले तेव्हा तिच्या वेदना बघवत नव्हत्या. ती मला म्हणाली मी नोकरीचा राजीनामा देते आहे. मला हे जीवन जगण्यात स्वारस्य वाटत नाही. मी हताश झाले आहे. हे दुखणं जीव नकोसा करणारं आहे. काही दिवसांनी परिस्थितीत फारसा फरक न होताच तिला सुटी मिळाली ती घरी गेली,मी घरून 'गजानन विजय 'ग्रंथ घेतला आणि तिला भेटायला गेले. तिला ग्रंथ देऊन म्हटलं काहीही करण्याची तुला इच्छा नाही हे जरी खरं असलं तरी ही पोथी वाच. जसं जमेल तसं,जेवढी जमेल तेवढी. एक पान,निदान पाच ओव्या रोज वाच. 'गजानन महाराजांच्या इच्छेने काय होईल ते होऊ दे ' असं म्हणून वाच. तिने माझी ती गोष्ट ऐकली आणि तिचं वाचन महाराजांपर्यंत पोहोचलं. हळूहळू ती खूपच बरी झाली. पुढे तिने दोन वर्षं नोकरी करून स्वेच्छानिवृत्ती घेतली. तिच्या घरच्यांनी हे सर्व जवळून अनुभवलं. त्यांनी स्वतःची कार घेतली त्यातून ते सहकुटुंब शेगांवला दर्शनासाठी जाऊन आले. आज तिचं पूर्ण कुटुंब महाराजांच्या भक्तीत विजय ग्रंथाच्या पारायणाचा आनंद घेत आहे.

आता माझं निवृत्तीचं वय झालं. आयुष्यातील पूर्व घटनांचा मी जेव्हा विचार करते तेव्हा मला पोथीतील ओव्या आठवतात.... संत मृत्यू ना टाळिती/निसर्गाप्रमाणे वागती/ परि संकटाते वारिती/आगंतुक असल्यास ते/ ..

घडणारी घटना तीच असते पण त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन फार महत्त्वाचा असतो. आपली दृष्टी महत्त्वाची असते आणि योग्य ती दृष्टी प्रदान करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंजवळ असतं. त्यामुळे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी मी एकच प्रार्थना करते, "आम्हा सर्व भक्तांवर कृपादृष्टी असू द्या आणि आमच्या कडून सतत नामस्मरण करून घ्या" श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺अनुभव--श्रीमती शीतल शरद करंदीकर .नाशिक

शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

 
 
 

Recent Posts

See All
🌺अनुभव १७५🌺 हाकेला धावणारा देव

" श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १७५) हाकेला धावणारा देव जय गजानन! मागील पंचवीस तीस वर्षांच्या काळात अनेक ठिकाणी गजानन महाराजांची...

 
 
 

コメント


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page