top of page

अनुभव - 39

Updated: Jun 6, 2020

"श्री "

गजानन महाराज की जय

* गजानन माऊलीचं अस्तित्व*


जय गजानन! असं म्हणतात माणसाच्या आयुष्यात हसण्याला फार महत्व आहे. हसत रहा मजेत रहा. हे खरंही आहे. पण मला इथे एक सांगावसं वाटतं की माणसाच्या आयुष्यात योग्य वेळी रडण्यालाही तेवढच महत्त्व आहे आणि ही जाणीव मला गजानन महाराजांनी माझ्या पहिल्या शेगांव भेटीत करून दिली. त्या दिवशी मी शेगांवला जर रडले नसते, तर एकतर मी आज मानसिक दृष्ट्या अस्वस्थ अवस्थेत असते,किंवा हृदय विकार अथवा अन्य व्याधीने ग्रस्त असते.

देव दर्शनाचा योग नशीबात असावा लागतो असं म्हणतात. खरं तर बुलडाणा जिल्ह्यातील 'रायपूर सैलानी ' या गावी माझं सासर आणि बुलडाणा जिल्ह्यातच 'शेगांव' म्हणजे वास्तविक लग्नानंतर शेगांव दर्शनाचा योग लगेच यायला हरकत नव्हती,पण योग आला नाही. अर्थात मला स्वतःला तेव्हा गजानन महाराजांविषयी माहितीही नव्हती.

माझं लग्न वायुसेनेत कार्यरत असणारे श्री. आत्माराम हनवते ( आता निवृत्त विंगकमांडर) यांच्याशी झालं. आमच्या संसारवेलीवर दोन फुलं फुलली. मोठी मुलगी ' मीता ' आणि धाकटा मुलगा 'संदीप'. वायुसेनेत असल्यामुळे जिथे यांची बदली होणार तिथे आमचा मुक्काम हलणार हे ठरलेलं होतं. मुलांचं शिक्षण होत असतानाच आमच्या मीताचं लग्न इ.स.1994 मधे तिच्या वयाच्या मानाने थोडं लवकरच एका आॅर्थोपेडिक डाॅक्टरशी झालं. इ.स.1996 ला तिला कन्यारत्न प्राप्त झालं. दिवस आनंदात चालले होते आम्ही तेव्हा राजस्थान मधे 'जैसलमेर' येथे होतो आणि मुलगी नाशिकला होती.

इ.स.1998 चा शेवट आमच्या जीवनात फार मोठं वादळ घेऊन आला. जावई, मुलगी आणि नात दुचाकी वरून जात असताना एका ठिकाणी समोरून एक डम्पर आला. बाजूला रेती पसरली होती,त्यावरून गाडी स्लीप झाली आणि आमची मुलगी गाडीवरून पडून जोरदार मुका मार लागल्याचं निमित्त झालं आणि वयाच्या फक्त 23 व्या वर्षी मुलीला पोरकं करून आमची 'मीता'या जगातून निघून गेली. आम्हाला जैसलमेर इथे निरोप आला तेव्हा जैसलमेर-नाशिक या साधारण साडेबाराशे कि.मी. प्रवासासाठी आम्हाला टॅक्सी करून निघावं लागलं.तीन दिवसपर्यंत तिचं शरीर अंत्यसंस्कारासाठी आमची वाट पहात होतं. प्रवासात आम्ही दोघं सुन्नपणे बसून होतो .नेमकं काय झालं कळायला मार्ग नव्हता अडीच वर्षाच्या नातीचा शोक पाहून आतल्या आत विचित्र कालवा कालव झाली. ह्यांची अवस्था विचित्र झाली. माणूस मोठा झाला की त्याला कधी कधी रडता पण येत नाही. मुलगी ह्यांची अत्यंत लाडकी. मला बरेचदा वाटतं की आम्ही स्त्रिया रडून अश्रूंना वाट करून देतो पण पुरूष बरेचदा आतल्या आत रडत राहतात. मग त्या सगळ्या विचारांचा परिणाम होऊन मी पण रडले नाही. बरेचदा शून्यात नजर लागून बसून रहायची. अबोल झाले,सर्व अर्थशुन्य वाटू लागलं,घरातून बाहेर पडू नये असं वाटायचं. त्याचा माझ्या वागण्या बोलण्यावर परिणाम होऊ लागला. हिला वेड लागेल की काय असं सर्वांना वाटू लागलं दोन महिने अशी सगळी स्थिती होती. अशात भुसावळला आमच्या एका नातेवाईकाकडे लग्न निघालं आणि मला थोडं जबरदस्तीनंच लग्नाला नेण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला. आम्ही भुसावळला पोहोचलो तिथे माझा एक भाऊ आला होता.सर्व परिस्थिती पाहून त्याने आग्रहाने आम्हा दोघांना शेगांवला गजानन महाराजांच्या दर्शनाला जाण्याचा सल्ला दिला. ह्यांना म्हणाला एकदा तुम्ही गजानन महाराजांचं दर्शन घेऊन तर या बघूया काय होतंय ते?ह्यांची सैनिकी शिस्त,हे नास्तिक नाहीत पण देवा संतांच्या दर्शनावर यांचा फारसा विश्वासही नव्हता,पण ह्यांनी शेगांवला जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही दोघं शेगांवला पोहोचलो. त्या दिवशी मी प्रथमच महाराजांचं दर्शन घेणार होते. मी दर्शनासाठी तळघरात उतरले महाराजांच्या नजरेतील ती विलक्षण करूणा मी पाहिली.ते जणू आत्मीयतेने मला विचारत होते "बाई गं काय दुःख आहे तुला?" बस्स!कुणी तरी आपलं भेटावं आणि त्याच्या जवळ आपण अंतःकरण मोकळं करावं असं झालं. माझा बांध फुटला,जोराचा हुंदका आला मी चेहेर्यावर दोन्ही हात धरून तशीच धावत वर आले. आवारात असलेल्या बेंचवर बसले आणि हमसून हमसून रडले. हे बाजूला उभे होते आणि अक्षरशः अर्धा तास मी रडत होते.रडणं थांबलं तेव्हा जसं काही आपल्या मनावरून कुणी मणभराचा भार खाली उतरवून ठेवावा तसं झालं. ह्यांचेही डोळे त्या दिवशी पाणावले. त्या दिवशी शेगांव माझं माहेर झालं.

त्या आमच्या वारीनंतर हे दोन कारणांनी महाराजांचे भक्त झाले,एक कारण तर उघड होतं,आम्हा दोघांनाही एक मानसिक आधार मिळाला आणि दुसरं कारण म्हणजे वायुसेनेत अधिकारी असूनही शेगांवची शिस्त,स्वच्छता आणि व्यवस्थापन पाहून ते खूष झाले. आमच्या शेगांव वार्या सुरू झाल्या आणि प्रत्येक वारी तेथील स्वच्छते विषयी, शिस्ती विषयी आम्हाला अनुभव समृद्ध करीत राहिली. दर्शनाच्या बारीत हजारो लोक असूनही कुठे गोंधळ नाही,मधे कधी चहाची सोय,औषधाची सोय,मधेच बाहेर जावं लागल्यास पासची सोय. सारच कसं शांततेत. प्रसादाचा दाणा पडला तरी सेवेकरी उचलून घेणार. इथे एक प्रसंग सांगावासा वाटतो.एकदा आनंद सागर परिसरात एक माणूस सवयीने खर्रा (मावा,गुटका) थुंकला मागेच असलेल्या सेवेकर्याने तो पुसून टाकला. थोडं समोर गेल्यावर पुन्हा तेच झालं. पण सेवेकर्याने काहीही बोलता पुन्हा पुसलं,हे त्या माणसानं पाहिलं,पुन्हा मान वाकवून थुंकणार तो नम्रपणे उभं राहून पुसण्याच्या तयारीत असलेल्या सेवेकर्याकडे त्याचं लक्ष गेलं. तो ओवाळला,त्यानं कान धरले आणि जवळील गुटक्याची पुडी केराच्या पेटीत टाकून सेवेकर्या समोर कान धरून 'माफ करा पुन्हा असं होणार नाही' असं बोलला.

ह्यांचं म्हणणं सैन्यात आम्ही शिस्त पाळतो,तिथे आम्हाला धाक असतो,बंधन असतं पण इथे असं काहीही नसताना हे कसं होतं?याचं उत्तर एकच!'इथे गजानन माउलीचं अस्तित्व आहे. '

असो,मधल्या काळात 'ओझर'ला होतो तेव्हा शेगांव शक्य होत होतं पण पुढे चंदीगड ला बदली झाली अन् त्या काळात शेगांव दर्शन होऊ शकलं नाही. मात्र नंतर मध्य प्रदेशात 'आमला' इथे ह्यांची बदली झाली. तिथून कारने सासरी आलो तर वाटेत शेगांव दर्शन शक्य होतं. सासरहून निघालं की शेगांव-अचलपूर-परतवाडा-भैसदेही,वाटेत घाट तिथे खंडोबा मंदीर आणि पुढे आमला असा मार्ग होता. वाटेत आदिवासी वस्ती असल्याने ट्रॅफिक तेव्हा त्या मानाने कमी होता. एप्रिल 2006 ची ही गोष्ट,आम्ही शेगांवहून दर्शन घेऊन निघालो,परतवाडा-भैसदेही च्या मधे घाट आहे. एकीकडे खोल दरी आहे. आमच्या मारूती 800 मधे मी आणि हे आम्ही दोघं होतो. गाडी वेगाने चालली होती. वाटेत रस्त्यातच एक दगड होता तो चुकवण्याच्या प्रयत्नात ह्यांचा कारवरील ताबा सुटला आणि कार दरीच्या बाजूला जाऊ लागली. समोर खोल दरी होती. आम्हाला आमचा मृत्यू दिसू लागला. मी जोरात गजानन बाबा धावा,गजानन बाबा वाचवा असं ओरडले आणि नशीबाने ब्रेक लागले पण त्याहीपेक्षा अचानक थांबावी अशी गचका देऊन गाडी थांबली. दोन बाजूनी आम्ही दोघं खाली उतरलो. मोजून दीडफुटावर खोल दरी होती चांगलीच खोल, तिथे गेलो असतो तर कदाचित कुणालाही काहीही मिळालं नसतं. काळ आला होता पण गजानन बाबांनी वेळ येऊ दिली नाही.

आम्ही दोघांनीही मृत्यू पाहिला होता. आमची दोघांचीही नजर त्या दरी खोर्यात आम्हाला वाचवणारा कोण?याचा शोध घेत होती. तिथल्या झाडाझुडपात,पाना फुलात,तिथे वाहत असलेल्या वार्यात गजानन माऊलीचं अस्तित्व शोधत असतानाच आम्ही नमस्कारा साठी हात जोडले आणि आमच्या तोंडून उत्स्फूर्त शब्द बाहेर पडले .. श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺 अनुभव--सौ.कमला आत्माराम हनवते. ठाणे

शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069

 
 
 

Recent Posts

See All
🌺अनुभव १७५🌺 हाकेला धावणारा देव

" श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १७५) हाकेला धावणारा देव जय गजानन! मागील पंचवीस तीस वर्षांच्या काळात अनेक ठिकाणी गजानन महाराजांची...

 
 
 

Comentarios


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page