अनुभव -58
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
Updated: Jun 13, 2020
"श्री"
गजानन महाराज की जय
* सत्य संकल्पाचा दाता *
जय गजानन! संत कवी ह.भ.प.दासगणू महाराजांनी रचलेल्या ज्या रसाळ ग्रंथातून आपल्याला श्री गजानन महाराजांची ओळख झाली,त्या एकवीस अध्यायी ग्रंथात एकूण तीन हजार सहाशे एकोणसत्तर ओव्या आहेत. अर्थातच ग्रंथ मोठा आहे. थोडं घाईनं वाचतो म्हटलं तरी,ग्रंथ वाचण्यासाठी किमान साडेतीन तास लागावेत असं म्हणता येईल. इ.स.1939 साली श्री क्षेत्र शेगांव येथे दासगणू महाराजांनी तो सांगावा आणि त्यांच्या लेखनिकांनी तो लिहून घ्यावा,अशा पध्दतीने एकवीस दिवसात एकवीस अध्याय रचल्या जाणं हे गजानन महाराजांच्या आशीर्वादामुळेच शक्य होऊ शकलं हे आपण सर्व गजानन महाराज भक्त मनातून जाणून आहोत.
असा हा मोठा ग्रंथ मुखोदगत होणं,तोंडपाठ होणं म्हणजे महाराजांचा कृपाशिर्वादच असायला हवा. आजच्या काळात म्हणजे इ.स.2018 या वर्तमान इसवीसनात श्री गजानन विजय ग्रंथ मुखोदगत असणार्यांची संख्या बरीच आहे. काही ज्ञात,काही अज्ञात. एक ओळ ऐकल्यावर पुढील ओळ आठवावी असे तर अनेक आहेत. याचं कारण 'ग्रंथाच्या पारायणाची वारंवारीता आज मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.' व्यक्तीगतरित्या, सामुहिकरित्या,जाहीरपणे,साखळी पारायणातून आज विजय ग्रंथाचं पारायण सर्वत्र होत आहे.
मात्र मी जी गोष्ट इथे सांगू इच्छितो ती साधारण पस्तीस एक वर्षापूर्वीची असावी,त्या वेळी कुणाला गजानन विजय ग्रंथ पाठ आहे,ही फार मोठी बातमी होती. निदान ज्ञात माहिती नुसार,तेव्हा अशा प्रकारे विजय ग्रंथ मुखोदगत असणे म्हणजे इतरांना एक नवीन मार्ग माहिती करून देण्यासारखं होतं. त्या काळात कुठून तरी माझ्या कानावर आलं की,नाशिकच्या सुमतीताई बापट आहेत,त्यांना गजानन विजय ग्रंथ पाठ असून,त्या त्यांची सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करीत आहेत. तेव्हा आजच्या सारखी प्रसिद्धी माध्यमं नव्हती. कधी वर्तमानपत्रात आलं तर वाचायला मिळणार. ती बातमी ऐकून मी त्यांच्या कार्यक्रमचा शोध घेऊ लागलो,मग अनेकवेळा सुमतीताईंना मी ऐकलं आणि त्यामुळे फारच प्रभावित होऊन मी गजानन महाराजांना प्रार्थना करू लागलो,वारंवार म्हणू लागलो,महाराज माझ्यावर कृपा करा. माझी इच्छा आहे की मला विजय ग्रंथ मुखोदगत व्हावा. त्या अनुषंगाने तसा प्रयत्न करू लागलो .महाराजांना मनातून म्हणायचो 'महाराज तुम्ही सत्यसंकल्पाचे दाते आहात. कृपा करा. ' अशात तळेगाव दाभाडे येथील न्यू आनंद नगर भागातील गजानन महाराज मंदिरात विश्वस्त म्हणून कार्य करण्याची संधी मला चालून आली. एकदा मिटींग मधे असा विषय चर्चेला आला की मंदिरात दर पौर्णिमेला तसेच प्रकटदिना सारख्या उत्सवाला मंदिरात महाराजांचं काही स्मरण व्हायला हवं, प्रार्थना व्हायला हवी. त्यातून असं ठरलं की,अशा दिवशी मी लोकांसमोर गजानन विजय ग्रंथाचं वाचन करावं. मग तसा क्रम सुरू झाला. मी विजय ग्रंथाचं पारायण करू लागलो पंचवीस तीस लोक समोर उपस्थित रहाणार आणि मी मोठ्याने वाचन करणार,आता मला बर्यापैकी पोथी पाठ होत आली होती. इ.स.2004 चा तो मे महिना असावा. दुपार ते संध्याकाळच्या मधील ती वेळ होती,माझं वाचन सुरू होतं. बारा अध्याय वाचून पूर्ण झालेत. तेरावा अध्याय सुरु होता,मी ओव्या वाचीत होतो.....
तो एकाएकी आकाश जाणा/भरून आले गर्जना/होऊ लागली मेघाची/चमके वीज माथ्यावरी/झंझावात सुटला भारी/कडकडा ती कांतारी/लागली झाडे मोडावया/ ...
आणि या ओव्या वाचीत असताना खरोखरच बाहेर वातावरण बदललं,एकाएकी वादळ सुरू झालं. माझ्या समोर असलेली पोथी जुनी होती. पानं मोकळी झाली होती. अचानक आलेल्या वार्या मुळे समोरील पोथीची पानं उडाली. मंदिरातच इतस्ततः विखुरली,माझी तारांबळ उडाली. समोर बसलेले श्रोते पानं गोळा करु लागले. आता पानं गोळा झाली तरी,ती क्रमवार लागणार केव्हा? पुढील वाचन होणार केव्हा? क्षणभर झालेला गोंधळ बाजूला सारून,मी महाराजांना प्रार्थना केली. महाराज आता माझ्या कसोटीचा क्षण आहे. पुढील वाचन सुरळीत पार पाडणं आता सर्वस्वी तुमच्या हातात आहे. अशी प्रार्थना करून मी वाचू लागलो,किंबहुना म्हणू लागलो,तेरावा अध्याय पूर्ण झाला. चौदाव्या अध्यायाकडे वळलो आणि पुढे उपस्थित सर्व श्रोत्यांच्या साक्षीने एकविसाव्या अध्यायापर्यंत महाराजांनी माझ्याकडून पोथीचं वाचन पूर्ण करून घेतलं. तिथून पोथी बाजूला जाऊन माझं मुखोदगत पारायण सुरू झालं. एक दोन करता करता शेकडो पारायणं महाराजांनी माझ्या कडून वेगवेगळ्या ठिकाणी करवून घेतलीत.
त्या दिवसापासून मी घरी ज्या फोटोसमोर महाराजांना आशीर्वाद मागत आलो, त्या फोटोकडे मी जागृत फोटो म्हणून पाहू लागलो. मला मनातून कल्पना आहे की आज महाराजांचे असे जागृत फोटो घराघरातून आहेत. घराघरातून महाराज त्या फोटोंच्या माध्यमातून आपल्या भक्तांकडे लक्ष ठेवून आहेत.
माझीही प्रार्थना अनेकवेळा महाराजांपर्यंत पोहोचली आहे. मला आठवतं एकदा प्रकट दिनाला खूप शोध घेऊनही अंबाडीची भाजी काही मिळू शकली नाही. अख्खी मंडई आधीच्या दोन चार दिवस पूर्ण धुंडाळली तरी भाजी काही मिळाली नाही. मी आपला महाराजांच्या फोटो समोर उभा आणि एकसारख्या ओव्या ओठांवर येऊ लागल्या...
भाकरी ती जवारीची/कांदा भाजी अंबाड्याची/उन पिठले हिरवी मिर्ची /ऐसे तयार करावे/....
महाराजांना म्हटलं या ओव्या आठवतात,पण हे व्हावं कसं? तुमची इच्छा!बरं प्रसादाला खूप लोक येणार. म्हणजे चाळीसेक जुड्या भाजी हवी,ती मिळावी कशी?
प्रकट दिन अगदीच उद्यावर येऊन ठेपला. मी माझ्या भाचे जावयांना,श्री महेश देहाडराय यांना ,जे पुण्यात असतात,एकदा मंडईत जाऊन या असं सांगितलं आणि ते त्यासाठी रवाना झाले. महाराजांना म्हटलं महाराज भाचे जावई मंडईत गेले आहेत. उद्या अंबाडीची भाजी कार्यक्रमात असावी असा योग असेल तर पहा.
काही वेळाने तळेगाव दाभाडे येथे मला भाचे जावयांचा फोन आला की शिवाजीनगरला येऊन तुम्ही अंबाडीची भाजी पंचेचाळीस जुड्या घेऊन जा. ते फोनवर आनंदाने सांगत होते अवघ्या मंडईत एका कोपर्यात एकाच व्यक्तीजवळ अंबाडीची भाजी उपलब्ध होती आणि जणू काही ते आमचीच वाट पाहत उभे होते. म्हणाले चार जुड्या जास्त असल्या तर हरकत नाही. चार लोकांच्या जागी सहा लोक होतच असतात. आमच्या कडे भाजी देऊन त्यांचा त्या दिवशीचा व्यवहार पूर्ण झाला.
असो तर मी आहे प्रकाश पटवर्धन,तळेगाव दाभाडे येथे वास्तव्यास असतो. आज माझ्यासह अनेकांना महाराजांची पोथी मुखोदगत आहे. मला असं नेहमीच वाटतं की कोणाकडून काय सेवा घडावी हे महाराजांनी ठरविलेलं आहे,त्यांच्या इच्छेने सर्व होत असतं. आम्हा काही लोकांकडे महाराजांनी मुखोदगत पारायणाची सेवा दिलेली आहे,ही आनंदाची बाब आहे. पण शेवटी सेवा कोणती हे महत्वाचं असलं तरी,ती सेवा कशा पद्धतीने केल्या जाते हे जास्त महत्त्वाचे नाही का?त्यामुळे महाराजांना हात जोडून आम्हा सर्व भक्तांसाठी एकच मागणं आहे की,महाराज तुम्हाला हवी ती सेवा आम्हा भक्तांकडून करवून घ्या,पण ती सेवा करीत असताना आमच्या अंतःकरणात एकच नाद उमटू द्या...
श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव--प्रकाश पटवर्धन
तळेगाव दाभाडे
शब्दांकन-- जयंत वेलणकर
9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा-- !!श्रीगजानन अनुभव !!
पृष्ठ संख्या 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त
Comments