अनुभव १३३🌺
- Jayant Velankar
- Aug 27, 2020
- 4 min read
Updated: Oct 6, 2020
"श्री "
गजानन महाराज की जय
*माझ्या माऊलीची रुपे अनंत!*
जय गजानन! मी सौ सुचेता धनंजय जोशी. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात मोहोपाडा येथे वास्तव्यास असते. माझ्या माहेरी माझ्या आजीने म्हणजे, वडिलांच्या आईने आमच्या घरादाराला एक गजाननमय शिस्त लावली. त्यामुळे घरातील प्रत्येकजण गजानन महाराजांची भक्ती करणार. गजानन विजयचं पारायण करणार. गजानन महाराजांची उपासना करणार आणि त्या माध्यमातून, होणार्या प्रत्येक कार्यामागे भगवंताचे अधिष्ठान ठेवण्याचा प्रयत्न करणार, हे ठरलेलं. त्याप्रमाणे मी सासरी आल्यानंतरही, प्रत्येक प्रसंग विशेषी गजानन महाराजांना प्रार्थना करून त्यांचा आशिर्वाद घेण्याचा प्रघात सुरू ठेवला.
आपण भक्त जेव्हा महाराजांचा आशिर्वाद मागतो तेव्हा, ' महाराज माझी प्रार्थना तुम्ही ऐकताआहात नं ' असा प्रश्न आपल्या मनात कुठेतरी डोकावतो. माझ्याही मनात डोकावतो.अशाच विचारातून महाराजांनी मला दिलेला एक अनुभव आपणास सांगावा असा विचार मनात आला पण सांगू की नको? अशा विचारात होते. आपण सामान्य भक्त! कसं सांगावं असा विचार मनात होता मात्र नुकतेच एका पुस्तकाविषयी आणि गजानन महाराजांच्या एका भक्तांविषयी काही वाचले अन् लक्षात आलं की, अरे असे प्रश्न मोठमोठ्यांच्या मनात येतात, तर आपल्या मनात येणारंच नं? तेव्हा आता, मी प्रथम त्या पुस्तकातील ती गोष्ट पुस्तकातील शब्दात जशीच्या तशी नमूद करते आणि मग माझाही अनुभव तुम्हाला सांगते.
आपलं शेगांव आहे नं? त्या शेगांवला समाधी मंदिरात , प्रत्यक्ष समाधी मूर्तीची पूजा करण्याचं परम भाग्य लाभलं तेही चाळीस वर्षांहुनही अधिक, ' असे श्री नांदेडकर गुरूजी ' ते गजानन महाराजांच्या चरणी लीन झाल्यानंतर मुंबईच्या, मेघना विश्वजीत अभ्यंकर यांनी त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलं ,त्याचं नाव आहे ' गजाननमय प्रेममूर्ती श्री नांदेडकर गुरूजी ' त्यात गुरुजींच्या विविध अनुभवांची मांडणी छान शब्दात केली आहे. गजानन महाराज भक्तांनी आणि विविध गजानन महाराज मंदिरातील पुजारी लोकांनी अवश्य वाचावं असं ते पुस्तक आहे. त्यातून एक अनुभव पुस्तकातील शब्दात! .....
" गुरूजींना एक प्रश्न नेहमी पडायचा. ते महाराजांना नेहमी विचारायचे की तुमचं खरं स्वरूप काय आहे ते दाखवा ना महाराज! तुज सगुण म्हणू की निर्गुण रे! अशी गुरूजींची मनस्थिती झाली होती. महाराज संकेत द्यायचे, गुरूजींशी त्यांचा संवाद असायचा पण त्यांचं खरं स्वरूप जाणून घ्यायचा गुरूजींना ध्यास लागला. एकदा संध्याकाळी नेहमी प्रमाणे गुरूजी समाधीस्थानी आरतीचं तबक हातात घेऊन आरती ओवाळत होते. तेव्हा तेजाचा एक मोठा गोल त्यांना महाराजांच्या जागी दिसला. त्याचे तेज इतके जबरदस्त होते की गुरुजींना ते सहन झाले नाही . ते थरथरायला लागले. त्यांचे डोळे दिपले, देहभान हरपले. त्यांना दिसत होतं ते अपूर्व तेज. गुरूजी थोड्या वेळाने भानावर आले, तर पंचारती हातात तशीच आणि कापूर इतस्ततः आंगावर पडला होता. पहिली आरती म्हटल्याचं त्यांना स्मरण होतं परंतु नंतरचं काही आठवत नव्हतं. जवळच्या सहकार्याला विचारलं तर तो म्हणाला ' 'सर्व नेहमी प्रमाणेच पार पडले'. गुरूजी मात्र त्या तेजात हरवून गेले. "
आपण भक्त सामान्य! सौम्य सात्विक रुपात महाराज समोर आले तर आपण ओळखू शकत नाही आणि काही वेगळ्याच रुपात दर्शन दिलं तर ते सहन करू शकणार नाही.
मला आठवतं इ.स.२००८ ची गोष्ट. आमच्या मोहोपाड्यात गणपती मंदिराच्या जीर्णोध्दाराचं काम करण्याचं ठरलं. माझे मिस्टर तिथे एक ट्रस्टी म्हणून कार्यरत असल्याने आम्हाला त्या कामात विशेष रुची होती. मिस्टर ' गणपती भक्त! ' अगदी धावून धावून मंदिरासाठी कार्य करण्यात सदैव तत्पर. दसरा होता त्या दिवशी भूमीपूजन झालं. माझ्या सवयी प्रमाणे मी घरी गजानन महाराजांना हात जोडले आणि प्रार्थना केली की महाराज, गणपती मंदिराचे बांधकाम उत्तम पध्दतीने होऊ द्या. मी इथे घरीच त्या साठी रोज एक अध्याय वाचीन . आमच्या घरी स्वयंपाक घर आणि देवघर एकत्र आहे त्यामुळे आम्ही पारायण वेगळ्या खोलीत बसून करत असतो. तर मी त्या मंदिरासाठी संकल्पपूर्वक पारायण सुरू केलं. तिकडे बांधकामाला छान गती प्राप्त झाली. माझं अखंड वाचन सुरू होतं. एक दिवस माझ्या मनात प्रश्न आला की आपण गजानन विजय वाचतो तर आहे, पण ते महाराजांपर्यंत पोहोचतं आहे कां? महाराजांचं आपल्या वाचनाकडे लक्ष आहे की नाही? त्या विचारात मी दिवसभर महाराजांना म्हणत राहिले, महाराज हे वाचन तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे. तुमचं माझ्याकडे लक्ष आहे याची काही विशेष खूण दाखवा. तुमच्या अस्तित्वाची काही जाणीव करून द्या. मी दिवसभर त्या विचारात होते, पुढे माझ्या मनातून तो विचार निघून गेल्यासारखा झाला. दुसरे दिवशी माझी वाचनाची वेळ झाली तेव्हा मी पुढील अध्याय वाचण्यासाठी म्हणून खोलीत प्रवेश केला आणि समोर बघते तो, माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मी नखशिखांत शहारले आणि जागच्या जागी खिळून स्तब्ध उभी झाले. मी जिथे पोथी वाचण्यास बसते त्या जागेवर एक काळाभोर नाग फणा काढून बसला होता. माझ्याकडे पहात होता. मी डोळे मिटून हात जोडले माझ्या अंतर्मनात कुठेतरी जाणवलं. ही महाराजांच्या अस्तित्वाची खूण आहे. मी काही क्षण प्रार्थना केली ' महाराज मला अभय द्या. मी तुम्हाला शरण आहे. ' अन मी डोळे उघडले, आता तिथे नाग नव्हता. माझं लक्ष फोटोंकडे गेलं , गजानन महाराजांच्या फोटोमागे जाताना मला शेपटीचा काही भाग दिसला. नंतर आम्ही खूप शोध घेतला पण आम्हाला काहीही आढळलं नाही.
मी आतून बाहेरून हालून गेले. महाराजांना म्हटलं महाराज, सौम्य सात्विक रुपातच तुमची सगुण भक्ती करण्यासाठी मला आशिर्वाद द्या. या पुढे अन्य काही विचार माझ्या मनाला शिवूही देऊ नका. महाराज हाकेला धावले! मोहोपाड्यात महाराजांच्या आशिर्वादाने सुंदर गणपती मंदिर उभारल्या गेले.
गणपती मंदिरातमाघी उत्सव पाच दिवस चालतो. शेकडो भक्त दर्शनाने तृप्त होतात. मीही दर्शनाला जाते. गणपती समोर नतमस्तक होते.
मात्र एकटी असताना आजही तो प्रसंग आठवला की अंग शहारून येतं आणि महाराजांसाठी आपसुकच हात जोडले जाऊन ओठांवर शब्द येतात. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- सुचेता धनंजय जोशी. मोहोपाडा, जिल्हा रायगड
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
🌸आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव !!
*भाग एक* यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास
*भाग दोन* यात एकूण बावन्न अनुभव आहेत ( ५३ते १०४) फक्त रुपये पन्नास.
...........................................
...........................................
*समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज उपासना*
शांतीरस आणि भक्तीरसपूर्ण मनःशांती प्रदान करून गजानन महाराजांची भक्ती प्रदान करणारी उपासना. ऐका आणि सोबत स्वतः म्हणा. संध्याकाळी सातच्या सुमारास अनेक ठिकाणी ही उपासना सुरू आहे. गुरुवारी आणि एकादशी ला तर मोठीच पर्वणी.
ऐका ... उपासना लिंक... https://youtu.be/WxKZ91xsve8
...........................................
Comments