अनुभव १३७🌺
- Jayant Velankar
- Oct 22, 2020
- 4 min read
"श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव १३७🌺)
*पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार*
जय गजानन! संत कवी श्री दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथात जीवनोपयोगी तत्त्वज्ञान, थोडक्यात आणि सुलभ शब्दात अनेक ठिकाणी मांडले आहे. कधी एखाद्या म्हणीच्या सहाय्याने तर कधी एखाद्या विचाराला बळकटी देण्याच्या निमित्ताने. आता ' शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ' अर्थात आधी शरीर उत्तम, तुमची प्रकृती उत्तम, तर त्या सहाय्यातून होणार्या पुढील गोष्टी होतील. अन्यथा बाकी गोष्टी कठीणच! या गोष्टीचा अनुभव आपण नेहमी घेतच असतो. मला आठवतं, तेव्हा मी अशाच काही परिस्थितीला सामोरा जात होतो आणि त्या दिवशी माझा सातवा अध्याय होता. सातव्या अध्यायातील सत्तावन्नावी ओवी मी वाचली....
पहिली संपत्ती शरीर/ दुसरे ते घरदार/ तिसरीचा तो प्रकार/ आहे धनमानाचा. ती ओवी वाचली अन् मला अतिशय रडायला आलं. त्याला कारणही तसंच होतं. शरीराची साथ नसेल तर, त्याचं नावही तू उच्चारू शकत नाही याचा अनुभव मी घेत होतो. मागील अडीच तीन महिन्यांपासून मला एका विचित्र आजाराने ग्रासले होतं. हळु हळु माझा आवाज बसत गेला. अशी वेळ आली की तोंडातून शब्द फुटेना. साधा शब्द उच्चारण्यासाठी खूप कष्ट पडू लागले. माझं स्तोत्र म्हणणं, आरती म्हणणं, भजन म्हणणं बंद झालं.
माणसाचे भोग सरले की औषध लागू पडतं असं म्हणतात.मी प्रथम पुण्यातील नामवंत होमिओपॅथ, ( एम. डी. होमीओ. ) कडून होमिओपॅथी ट्रीटमेन्ट घेतली पण दोन तीन आठवडे झाले तरी प्रकृतीत म्हणावा असा फरक काही जाणवला नाही. माझा आवाज काही मोकळा होत नव्हता. शेवटी त्याच डाॅक्टरांनी मला कान नाक घसा तज्ञाला दाखवा असा सल्ला दिला. त्यावरून मी औंध पुणे येथील हाॅस्पिटलला घसा तज्ञ डाॅक्टरांची भेट घेतली. त्यांनी मला व्यवस्थित तपासलं आणि लॅरिंगोस्कोपी केली. (लॅरिंगोस्कोपी म्हणजे आपल्या घशात मागील बाजूला व्हाॅईसबाॅक्स मधे व्होकल काॅर्ड असते, त्याचं परिक्षण. )माझ्या कंठामधे दोन्ही बाजूला गाठी असल्याचं निदान केलं. डाॅक्टरांनी औषधं लिहून दिलीत व सात दिवसांनी बोलावलं. त्या प्रमाणे मी सात दिवसांनी परत डाॅक्टरांना भेटलो. परंतु मला काहीही आराम न वाटल्यामुळे त्यांनी पुन्हा लॅरिंगोस्कोपी करून पंधरा दिवसांचं औषध बदलून लिहून दिलं. पण पुढेही आवाज जसाच्या तसाच. काहीही फरक नाही. कंठातून आवाज फुटत नव्हता. डाॅक्टरांनी काही सूचना केल्यात.बोलताना जोर देऊ नका. जास्त वेळ बोलू नका. स्तोत्र, पोथी मनातल्या मनात म्हणा. अशा सूचना करून डाॅक्टर संदिग्धपणे पुटपुटल्या. पंधरा दिवसांनी या बघू नाहीतर सर्जरीचा विचार करू. त्यांचं ते वाक्य ऐकून मी मनात नाही म्हटलं तरी हादरलोच. मी स्वतःही व्यवसायाने आयुर्वेद डाॅक्टर! डाॅक्टर अशोक ब्राम्हणकर, मी आयुर्वेदाचही औषध घेतलं होतंच.कुठल्याच औषधाला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि आता सर्जरी. म्हणजे पुढे बायप्सी, त्यातून निदान! कॅन्सर तर नसेल? एक ना अनेक विचार मनात घोंगावून गेलेत.
शरीराच्या आणि मनाच्या अशाच त्या अवस्थेत मी ती ओवी वाचली. मनातल्या मनात. पहिली संपत्ती शरीर... आणि रडू लागलो. महाराजांना म्हटलं ' महाराज तुमचं गुणगान गाण्यासाठी तरी माझा आवाज जिवंत ठेवा. गेली कित्येक वर्ष मी गजानन विजय वाचतो आहे. तुमचं भजन म्हणतो आहे. मला ते भजन पुन्हा म्हणायचं आहे. महाराज माझ्या आवाजाचं रक्षण करा. माझ्या त्या आजारपणात त्या दिवशी प्रथमच मी इतक्या तीव्रतेने महाराजांना विनवलं असेल.
दरम्यान पौष महिना लागला. माझ्या मुलाच्या वाढदिवसाला दरवर्षी शेगांव संस्थानमधे पौष कृष्ण पंचमीला शाश्वत अन्नदान होत असतं त्यासाठी आम्ही सहपरिवार हजर राहण्यासाठी १५ जानेवारी २०२०ला शेगांवला गेलो. मधील काळात नागपूरचे प्रख्यात घसा तज्ञ डाॅ मदन कापरे यांची वेळ मागून ठेवली. जेणेकरून शेगांवहून नागपूरला जाता येईल व तपासणी होऊ शकेल.
आम्ही शेगांवला उतरलो. मी आणि माझ्या पत्नीने पारायण मंडपात पूर्ण पारायण केलं. मी सामान्यतः पारायण सुरू करण्यापूर्वी महाराजांना काही मागणं मागत असतो, पण यावेळी तसं काहीही न मागता मी पारायण सुरू केलं. पोथीचं शेवटचं पान वाचून संपलं आणि अचानक सुचलं की आपला घशाचा त्रास कमी होण्यासाठी महाराजांना विनवणी करावी. म्हणून मी पोथी संपल्यावर ग्रंथ माझ्या घशाला घासला आणि जागेवर ठेवून दिला. ग्रंथ ठेवला आणि त्याच क्षणापासून व्याधी बरी होण्याची प्रक्रिया सुरू झाली, असा संकेत मिळत गेला. मंदिर भावपूर्ण अंतःकरणानं सोडलं आणि नागपूरच्या दिशेने जाणार्या गीतांजली एक्सप्रेस मधे आम्ही प्रवेश केला.
आमच्या डब्यात दर गुरुवारी नागपूर-शेगांव यात्रा करणार्या ५-६ महिला भक्त होत्या. त्यांच्या सोबत आमची 'गजानन महाराज ' या विषयावर चर्चा सुरू झाली .मी त्यांना या आधी मला महाराजांनी जीवघेण्या आजारातून कसं वाचविलं वगैरे बोललो. त्या महिला मला महाराजांचं भजन म्हणा म्हणून आग्रह करू लागल्या तेव्हा माझ्या घशाच्या त्रासाविषयी त्यांना सांगून मी भजन म्हणण्याचं टाळू लागलो, पण त्यावर माझी पत्नी म्हणाली की त्यांचा एवढा आग्रह आहे तर म्हणा जसं जमेल तसं महाराजांचं भजन.. शेवटी मी महाराजांचं स्मरण करून दर गुरुवारी मी जे भजन पूजेत म्हणायचो ते म्हटलं. भजन म्हणतानाच मला जाणवलं, आपला आवाज मोकळा होतो आहे. खरोखरच त्या क्षणापासून आवाज एकदम मोकळा झाला. काहीच त्रास नाही.
मी डाॅक्टर कापरे यांची भेट घेतली. ते माझे जुने मित्र. त्यांनी माझं सर्व म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. म्हणाले, थांबा डाॅक्टर आपण लॅरिंगोस्कोपी करू. टेस्ट झाली, डाॅक्टर कापरे म्हणाले ,व्होकल काॅर्डवर एकही गाठ नाही. संपूर्ण रिपोर्ट नाॅर्मल आहे. त्यांचं ते वाक्य ऐकून मी आनंदातिरेकाने ओरडलोच .काय म्हणता डाॅक्टर रिपोर्ट नाॅर्मल? असं म्हणून मी आकाशाकडे पाहिलं, त्यावर डाॅक्टर म्हणाले, अहो रिपोर्ट नाॅर्मल आल्याचं मी तुम्हाला सांगतो आहे आणि तुम्ही वरती पाहता आहात? त्यावर मी बोललो. डाॅक्टर तुम्हाला धन्यवाद मी देणारच आहे. प्रथम त्याचे आभार मानून घेतो. असं म्हणून मी वर पाहून हात जोडले आणि उद्गारलो.. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- अशोक ब्राम्हणकर, सांगवी पुणे
...........................................
*समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज उपासना*
शांतीरस आणि भक्तीरसपूर्ण मनःशांती प्रदान करून गजानन महाराजांची भक्ती प्रदान करणारी उपासना. ऐका आणि सोबत स्वतः म्हणा. संध्याकाळी सातच्या सुमारास अनेक ठिकाणी ही उपासना सुरू आहे. गुरुवारी आणि एकादशी ला तर मोठीच पर्वणी.
ऐका ... उपासना लिंक... https://youtu.be/WxKZ91xsve8
Comments