अमेरिकेत शिकॅगो येथे सप्टेंबर २०२१ मधे झालेल्या श्री गजानन महाराज भक्त संमेलनात वाचण्यात आलेला लेख
- Jayant Velankar
- Sep 23, 2021
- 11 min read
|| श्री ||
(अमेरिकेत शिकॅगो येथे सप्टेंबर २०२१ मधे झालेल्या श्री गजानन महाराज भक्त संमेलनात वाचण्यात आलेला लेख)
||गणी गण गणांत बोते ||
’गणी गण गणांत बोते’ हा मंत्र महाराष्ट्रीयन माणसाच्या, मराठी माणसाच्या कानावर पडला, त्याच्या नजरेसमोर आला की भलेही त्याने संतकवि ह.भ.प. दासगणू महाराजांच्या रसाळ वाणीतून उतरलेला, त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची लीला वर्णन करणारा श्री गजानन विजय ग्रंथ वाचलेला नसला तरीही त्याला जाणवतं की ही अक्षरं, हे शब्द श्री गजानन महाराजांशी संबंधित आहेत.
श्री क्षेत्र शेगाव येथे इ.स. 1878 ला प्रकट झाल्यानंतर 8 सप्टेंबर 1910 रोजी गजानन महाराज समाधिस्त झालेत. या बत्तीस वर्षांच्या काळात महाराजांनी विविध लीलांच्या माध्यमातून अनेक भाविकांना कैवल्याच्या मार्गावर आणून सोडले. त्या लीलेचाच एक भाग की काय, महाराज सतत म्हणत असायचे ’गणी गण गणांत बोते’ !
गजानन महाराज जे शब्द उच्चारीत असत त्या शब्दांविषयी चिंतन करणं हे महाराजांच्या भक्तांसाठी एक पुण्यकर्मच आहे. त्याच उद्देशानं आपण इथे गणी गण गणांत बोते विषयी चिंतन करूया !
संतकवि दासगणू महाराज यांनी गणी गण गणांत बोते यावर केलेलं काव्य, त्या काव्याचा प्रथम आपण आपल्या विषय मांडणीसाठी आधार घेऊ. दासगणू महाराज म्हणतात....
गणी गण गणांत बोते | हे भजन प्रिय सदगुरूते ||
या श्रेष्ठ गजानन गुरूते | तुम्ही आठवित रहा याते ||
हे स्तोत्र नसे अमृत ते | मंत्राची योग्यता याते ||
हे संजीवन आहे नुसते | व्यावहारीक अर्थ न याते ||
मंत्राची योग्यता कळते | जो खराच मांत्रिक त्याते ||
या पाठे दुःख ते हरते | पाठका अति सुख होते ||
हा खचित अनुग्रह केला | श्री गजानने तुम्हाला ||
घ्या साधुन अवघे याला | मनी धरून भावभक्तीला ||
कल्याण निरंतर होई | दुःख ते मुळी नच राही ||
असल्यास रोग तो जाई | वासना सर्व पुरतीलही ||
आहे याचा अनुभव आला | म्हणूनियां कथित तुम्हांला ||
तुम्ही बसून क्षेत्र शेगांवी | स्तोत्राची प्रचिती पहावी ||
ही दंतकथा ना लवही | या गजाननाची ग्वाही ||
दासगणू महाराजांनी इतक्या सोप्या शब्दात हे सर्व सांगितलं आहे की वाचता क्षणीच सर्व अर्थ आपल्या नरजेसमोर स्पष्टपणे उलगडत जातो. प्रथम आपण यात स्थूलमानाने काय म्हंटल आहे ते पाहू नंतर त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू.
गणी गण गणांत बोते या मंत्राची महती सांगण्यासाठी केलेल्या काव्यात दासगणू महाराज म्हणतात......समर्थ सदगुरू श्री गजानन महाराजांना गणी गण गणांत बोते हे भजन अत्यंत प्रिय आहे. तेव्हा तुम्ही याचं सतत स्मरण
करीत रहा. हे केवळ स्तोत्र नाही तर हे अमृतरूपी स्तोत्र आहे. एखाद्या मंत्राची जी योग्यता असते तशी योग्यता याला प्राप्त झाली आहे. त्यामुळे हा एक मंत्रच आहे. व्यावहारिक पातळीवर हे निरर्थक असेल तरी तुम्ही हे नित्य आठवीत रहाल तर तुम्हाला एक नवसंजीवन यातून प्राप्त होऊन हा एक चैतन्याचा स्त्रोत असल्याचा अनुभव येईल. याला मंत्राची योग्यता आहे पण ती योग्यता त्यालाच कळू शकेल की जो अनुभव घेण्यास तत्पर असेल आणि याच तत्परतेतून जो याचे पठण करील त्याला त्याच्या दुःखाचं विस्मरण होऊन सुखाचा अनुभव येईल.
हा एकप्रकारे श्री गजानन महाराजांनी आपल्यावर अनुग्रह केलेला आहे. अनुग्रहीत शिष्याने सद्गुरू आज्ञेचं अत्यंत भावभक्तीनं पालन केलं तर त्याच्यासाठी ते कल्याणकारी ठरत असतं. त्याला निरोगत्व प्राप्त होऊन त्याच्या इच्छांकडे सद्गुरू लक्ष पुरवितात.
दासगणू महाराज म्हणतात हे मी तुम्हाला अनुभवाच्या कसोटीवर पारखून सागंतो आहे. मी तुम्हाला गजानन महाराजांची ग्वाही देऊन सांगतो, तुम्ही या स्तोत्राचं म्हणजे गणी गण गणांत बोते या मंत्राचं सतत स्मरण करा श्री क्षेत्र शेगांवी बसून तुम्हाला या स्तोत्राची प्रचिती पाहता येईल.
आता आपण हे सर्व सविस्तरपणे समजावून घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी प्रथम ’मंत्र’ या विषयावर आपल्याला विचार करावा लागेल.
मंत्राची योग्यता याते
’मननात् त्रायते इति मंत्रः’ असे संस्कृत वचन आहे. ज्याचे मनन केले असता, जो तारुन नेतो तो मंत्र! अशी मंत्राची एक व्याख्या आहे. मंत्रोच्चारातून निर्माण होणार्या उर्जा स्पंदनामुळे आपल्याला आत्मिक सुखाची अनुभूति होऊन मनाला संरक्षण प्राप्त होते अशी मान्यता आहे. जाणकार असं म्हणतात की ’मंत्र म्हणजे एक ध्वनी, एक शब्द, एक अक्षर किंवा अनेक शब्दांचा एकत्रित समूह, ज्याच्या पुनरूच्चाराने भौतिक, आत्मिक आणि अध्यात्मिक उन्नती होते’. येथे पुनरूच्चारण महत्त्वाचं आहे, हे लक्षांत घेणं आवश्यक आहे. अर्थात मंत्र म्हणण्यातील वारंवारीता येथे महत्त्वाची ठरते.
गजानन महाराज वारंवार उच्चारण करीत असत ’गणी गण गणांत बोते’ 'ग’ आणि ’ण’ या दोन अक्षरातच प्रामुख्याने हा मंत्र सामावला आहे. ही दोन्ही अक्षरं आधीपासूनच प्रचलित आहेत. पण गजानन महाराजांनी ती म्हटली, त्यांच्या वाणीतून हे उच्चारण झालं आणि ते उल्लेखनीय ठरलं.
ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात म्हटलं आहे ’अर्जुना’ , वर्ण मालिकेतील बावन्न वर्ण! त्या बावन्न वर्णाचं उच्चारण प्रत्येक माणूस करीतच असतो आणि कुठलाही मंत्र ह्या बावन्नवर्णापलिकडे नाही, परंतू मंत्राची हातवटी जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत वाणीला मंत्र उच्चाराचे फल प्राप्त होत नाही.
’गणी गण गणांत बोते’ हा मंत्र महाराजांनी दिला, व्यावहारिक पातळीवर भक्तांनी त्याकडे पाहिलं तर त्या अक्षरांना काही अर्थ नव्हता. पण तोच मंत्र गजानन महाराजांच्या मुखातून उमटला आणि मंत्र झाला.
अध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार, त्या क्षेत्रातील अभ्यासक म्हणतात ’साधू संतांचे उद्गार हे तुर्यावस्थेतील असल्यामुळे (तुर्यावस्था - साधू संताना अध्यात्मात प्राप्त झालेली उच्चावस्था) त्यांचे वांरवार पठण केल्याने ते साधकांना त्यांचे अवस्थेत पोचवू शकतात.
जागृती, स्वप्न व सुषुप्ती या अवस्था टाकून पलीकडे गेल्यावर प्राप्त होणारी अवस्था ती ’तुर्यावस्था’! तुर्यावस्था ही आत्म्याची शुद्धावस्था-आत्म्याच्या या शुद्धावस्थेत साधू संत काही तत्त्वज्ञान सांगून जातात. काही हितोपदेश करून जातात, तो व्यावहारिक पातळीवर मानवाला कळो अथवा न कळो त्या ज्ञानाचं मूल्य फार मोठं असतं.
साधू संतांचे बोल कानावर यायला भाग्य लागतं. ते समजण्यासाठी महत् भाग्य लागतं आणि ते आचरणात आणण्यासाठी भगवंताची कृपादृष्टी महत्त्वाची ठरते. ही कृपादृष्टी प्राप्त होण्याकरिता आवश्यक ठरतं त्यांनी दिलेल्या मंत्राचं पुनरूच्चारण! निष्ठेने आणि श्रध्देने जो पुनरूच्चारण करील अर्थात सातत्याने जप करील तो मांत्रिक! त्या मांत्रिकाला मंत्राची योग्यता कळून, तो स्वतःची उन्नती करून घेईल. तो अनुभव घेईल. त्याला मंत्राची योग्यता अनुभवता येईल.
’गणी गण गणांत बोते’ सांकेतिक आणि सूत्ररूप भजन
दासगणू महाराजांनी याला सांकेतिक आणि सूत्ररूप असं म्हटलं आहे. त्या अनुषंगाने आता विचार करू. साधू संत सत्पुरूष बरेचदा काही सांकेतिक बोलतात. त्यांचं बोलणं, त्यांची कृती याचा तेव्हा सभोवताल असणार्या सामान्यजनांना अर्थबोध होतोच असं नाही. कालांतराने लक्षात येतं की त्या गोष्टीचा अर्थ काय होता. उदाहरणार्थ गजानन महाराज जेव्हा शेगावला समाधिस्त झालेत त्या सुमारास तिकडे शिरडीला साईबाबा अत्यंत अस्वस्थ झाले होते आणि माझा भाऊ गेला असं काहीसं बोलत होते, तेव्हा तिथे उपस्थितांना काही बोध झाला नाही मात्र, पुढे ही बातमी कळली तेव्हा त्या गोष्टीचा उलगडा झाला.
गजानन महाराज देहात असताना वारंवार ’गणी गण गणांत बोते’ असं म्हणत असल्याची नोंद आहे, यावरूनच त्यांना गजानन महाराज नाव दिल्याचं आपण पोथीत वाचतो. त्यावेळी स्थानिक लोकांना त्याचा बोध झाला नाही किंवा कदाचित त्यांनी तसा प्रयत्न केला नाही. मात्र त्या शब्दांमुळे त्यांना गिणगिणे बुवा म्हणत अशी नोंद आहे, असो. स्वाभाविकपणेच गोविंदबुवांचा घोडा शांत केला तेंव्हाही महाराजांच्या मुखात ते शब्द होतेच.
गोविदबुवा टाकळीकरांचा द्वाड घोडा महाराजांनी शांत केला तेव्हा महाराज त्या घोड्याच्या चौखुरात म्हणजे चार पायांच्या मधोमध जाऊन झोपले. आपण सामान्यजन द्वाड घोडा तर जाऊ द्या पण एखाद्या सज्जन आणि मवाळ घोड्याच्या खाली झोपण्याची कल्पना तरी करू शकू का? पण महाराज निजलेत आणि मुखाने ’गणी गण गणांत’ भजन म्हणून निर्धास्त होते. या प्रसंगाच्या निमित्ताने दासगणू महाराजांनी केलेलं वर्णन इथे विचारात घेण्यासारखं आहे. कारण त्याच अनुषंगाने आपला विषय पुढे सरकू शकेल तेव्हा नवव्या अध्यायात याप्रसंगी दासगणू महाराज काय म्हणतात ते पाहू, दासगणूंच्याच शब्दात -
‘मुखे भजन चालले होते, गणी गण गणांत बोते या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो? या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्माहून नाही भिन्न हे सुचवावया कारण गणांत हा शब्द असे. बोते हा शब्द देखा अपभ्रंश वाटे निका, बाते हा शब्द ऐका तेथे असावा निसंशय. ’बा’ या शब्देकरून घेतले पाहीजे मन, ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले. म्हणजे मना समजे नित्य जीव हा ब्रह्मास सत्य, मानू नको तया प्रत निराळा त्या तोची असे. ’गिण गिण गणांत बोते’ कोणी ’गणी गण गणांत बोते’ ऐशी आहेत दोन मते या भजनाविषयी शेगांवी.‘
आता दासगणुंचे हे शब्द अधिक खुलासेवार समजावून घेण्याचा प्रयत्न करू.
हे भजन सांकेतिक आहे. सूत्ररूप आहे, सूत्र काय आहे? गणी= मोजी (मोजणे), गण=जीवात्मा, गणांत=ब्रह्मात.
गणी म्हणजे मोजणे, हे वाक्यात उपयोगातून सहज लक्षात येऊ शकेल. समजा आपण कुठे गेलो तिथे आधीच नऊ लोक आहेत. त्यांची जेवणाची तयारी आहे त्यांनी आपल्याला विचारलं, आमच्या बरोबर जेवणार कां? आपल्याला भूक नसेल तर आपण म्हणू, नाही, माझी ’गणना’ तुमच्यात करू नका मला तुमच्यात गणू नका, तुमच्यात मोजू नका.
पण समजा, मला तुमच्यासोबत मोजा, गृहीत धरा, माझी त्यात गणना करा असं सांगायचं आहे आणि हे काव्यात्मक भाषेत, कवितेतून सांगायचं झाल्यास आपण त्याला म्हणू शकतो ’अरे बाबा गणी मज तुमच्यासोबत’ अर्थात गणी=मोजी, मोजणे.
दासगणू महाराजांनी ’बा’ म्हणजे मन असे समजले आहे. आता आपल्याला मराठी माणसाची लकब, त्यातही प्रामुख्याने वर्हाड कडील मराठी माणून नजरेसमोर ठेवावा लागेल. मराठी माणूस समोरच्या व्यक्तीला समजावून सांगताना म्हणतो ’अरे बाबा हे तसेच आहे’ हेच स्वतःच्या मनाला सांगताना, स्वगत बोलताना स्वतःची समजूत घालताना, स्वतःला तो म्हणेल अरे बाबा हे तू नीट समजावून घे. पुढे या बोलण्याची वारंवारिता वाढली, माणूस वारंवार हे उच्चारायला लागला की अरे बाबा च्या ऐवजी उरतो फक्त ’बा’ अरे बा! पुढे ’अरे’ पण निघून जाऊन राहतो तो ’बा’ ते तसं नाही रे ’बा’ किंवा ’बा’ ते तसंच नाही नरे ’बा’ अर्थात मनाला उद्देशून ’बा’ अक्षर आले. समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांत मनाला सांगताना ’रे’ मना असं संबोधिले आहे. अर्थातच स्वतःच्या मनाला संबोधित करताना ’रे’ मना ’बा’ मना असे संबोधून बोलणे हा प्रकार लक्षात घेता मनाला उद्देशून ’बा’ अक्षर हे स्पष्ट होते.
म्हणजे आता सूत्ररूप भजन म्हटल्यावर सूत्र काय झालं, ’हे मना या जीवात्म्याची मोजणी तू ब्रह्मात कर’ अर्थात सर्व एकच आहे. ही बाब अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी एक कथा इथे नमूद करण्यासारखी आहे.
एकदा प्रभू रामचंद्र त्यांच्या महालात असताना मारुतीराया तिथे आले त्यांनी रामाला वंदन केले. तेव्हा रामाने थोडं मिश्कीलपणे मारुतीला प्रश्न केला कस्त्वम्? तू कोण आहेस? त्यावर मारुतीने लगेच हात जोडून उत्तर दिले.
देहदृष्ट्या तु दासोऽस्मि, जीवदृष्ट्या त्वदंशकः
वस्तु तस्तु त्वमेवाहमिती मे निश्चिता मतिः ेेंं
प्रभो, देहदृष्टया विचाराल तर मी तुमचा दास आहे, जीवदृष्ट्या विचाराल तर मी तुमचा अंश आहे आणि तत्वदृष्टया म्हणाल तर वास्तविक जे तुम्ही आहात तोच मी आहे, अशी माझी पक्की धारणा आहे. अर्थात सर्व एकच आहे. आता महाराजांनी सांकेतिक भाषेत जे सांगितलं, सूत्ररूपात जे मांडलं म्हणजे ’गणी गण गणांत बोते’ ते त्यांनी अनेकवेळा सोप्या भाषेत सांगितल्याचं ’गजानन विजय’ च्या माध्यमातून आपल्याला जाणवतं. पहिल्या अध्यायात दामोदर महाराजांना पाणी देण्यास तयार झाल्यावर महाराज त्यांना काय म्हणाले ’एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरला यत्किंचित.’ अर्थात महाराज सांगताहेत सर्व एकच आहे ’गणी गण गणांत बोते’.
सहाव्या अध्यायात गजानन महाराज जेव्हा नरसिंग महाराजांशी हितगूज करतात तेव्हा त्यांना म्हणतात ’तू मी आणि शेषशायी, एकरूप आहो पाही, जन जनार्दन भिन्न नसे’ सर्व एकच आहे ’गणी गण गणांत बोते’. बंकटलालच्या मळ्यात महाराजांच्या अंगावर माशा येऊन बसल्या, चावल्या तेव्हा महाराज बंकटलालला सांगतात ‘मला त्याची मुळीच बाधा होणार नाही त्या माशीरूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणोन. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा‘ सर्व एकच आहे ’गणी गण गणांत बोते’.
आता फिरून पुन्हा आपण घोड्याखाली महाराज झोपले तो प्रसंग नजरेसमोर ठेवला, चौखुराखाली महाराज निजले आहेत. मुखाने ’गणी गण गणांत’ भजन म्हणताहेत, घोडा शांत झाला आहे. या प्रसंगाचं वर्णन करताना दासगणू महाराज म्हणतात की जणू भजनरूपी साखळीने घोडा बांधून ठेवला. येथे भजनाला साखळीची उपमा दिली आहे. महाराजांच्या लीलेमुळेच गोविंदबुवा साखळी विसरले होते. कारण हा प्रसंग घडायचा होता. साखळीची उपमा येथे योग्य आहेच आणि त्याला एक गर्भित अर्थही आहे तो म्हणजे जीवाला ब्रह्मात मोजला तर ती साखळी एकच आहे.
वर आपण पाहिलं महाराज म्हणतात ’तुम्ही आम्ही भेद तेथे नाही उरला यत्किंचित’ ते म्हणतात ’तू मी आणि शेषशायी एक रूप आहो पाही’ ते असही सांगतात ’माशीरूप सच्चिदानंदा म्या जाणलं’ जे महाराजांनी सांगितलं तेच घोड्याच्या प्रसंगात त्यांनी कृतीतून दर्शविलं. कारण सर्व एकच आहे तर घोडा कुठून वेगळा उरला? सर्व एकच आहे ’गणी गण गणांत बोते’. असो, तेव्हा हा सांकेतिक मंत्र समजून घेऊन श्रध्देने ज्याने म्हटला किंवा अर्थ फारसा लक्षात आलाही नसेल पण भावपूर्ण अंतःकरणाने ज्याने या मंत्राचा जप केला त्याने त्या माध्यमातून गजानन महाराजांचं स्मरण केलं हे निश्चित.
’गणी गण गणांत बोते’ एक सिध्दमंत्र
सिध्दमंत्र म्हणजे काय? या विषयी निश्चित अशी व्याख्या नाही. मात्र ज्या मंत्राचा जप साधक करतो आहे त्याला त्या जपाची प्रचिती येणं महत्त्वाचं आहे. अशी प्रचिती आली तर तो मंत्र त्या साधकासाठी सिध्द मंत्र झाला. मध्यंतरी कुठेसं वाचल्याचं स्मरणांत आहे, त्यात लेखकांनी म्हटलं आहे की जितके अक्षरी मंत्र आहे निदान तितके लाख जप जेव्हा साधक करील तेव्हा त्याच्यासाठी तो सिध्द मंत्र होईल. या मागचा मतितार्थ लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे, सहजासहजी मंत्र सिध्द होत नाही. अत्यंत निष्ठेने आणि इष्ट दैवताला स्मरून दीर्घकाळ जेव्हा जप कराल तेव्हा तो जप तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकेल.
मंत्र जेव्हा सत्पुरुषाकडून, साधू संतांकडून, सद्गुरुंकडून प्राप्त असतो तेव्हा तो सहज साध्य आणि सहज सिध्द होऊ शकतो. अशा मंत्राची प्रचिती आजही शेकडो लोकांना येते आहे असे अनुभवास येते. ’गणी गण गणांत बोते’ या मंत्राची प्रचिती आजही शेकडो लोकांना येते आहे,(अवश्य वाचा ’श्री गजानन अनुभव’ भाग एक व दोन ).
’गणी गण गणांत बोते’ हा नऊ अक्षरी मंत्र आहे. दासगणू महाराज म्हणतात ’आहे याचा अनुभव आला म्हणूनिया कथित तुम्हाला’ आपल्याला अनुभव येण्यासाठी योग्य तो जप आपल्याकडून महाराजांनी करवून घ्यावा अशी आपण महाराजांना प्रार्थना करू या.
’गणी गण गणांत बोते’ या *मंत्राचा जप
आपण मंत्राचा सातत्याने जप करतो तेव्हा त्यामुळे आपल्या मनाचा पोत बदलतो. मनातील त्या बदलामुळे आपली एखाद्या घटनेकडे पाहण्याची दृष्टी बदलते. आता समजा एखाद्या परिस्थितीचा आपल्या मनाला त्रास होतो आहे
तेव्हा ती परिस्थिती बदलली अथवा त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन आपल्या मनाच्या ठेवणीप्रमाणे बदलला तर परिणाम आपल्याला अनुकूलच ठरणार. ही जी मनाची संजीवनी आहे ती आपल्या मनाला चैतन्य मिळून प्राप्त होते. तसंच वासनांचही आहे ’वासना सर्व पुरतीलही’ यात तुमची इच्छा पूर्ण झाली तर आनंद आहेच पण नामस्मरणामुळे वासनांचा क्षय झाला तरी परिणाम अनुकूलच ठरणार आहे. असो, जसजशी जपकर्त्यांची जपसंख्या वाढत जाईल तसतसा जपकर्ता अनुभवसमृद्ध होत जाईल, त्याचवेळी जपाची संख्या जितकी जास्त वाढत जाईल तितका तो मंत्र अधिकाधिक सिद्ध होत जाईल. त्यातून मिळणारी उर्जा आणि निर्माण होणारी स्पंदने याचा जास्तीत जास्त लाभ जपकर्त्याला मिळू शकेल.
नामजपाला जास्तीत जास्त चालना मिळावी या उद्देशाने इ.स. 2016 पासून ‘समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज उपासना केंद्र‘ नागपूरच्या माध्यमातून प्रत्येक चातुर्मासात (आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी मधील काळ) ’गणी गण गणांत बोते’ या सिद्ध मंत्राचा जप आयोजित करण्यात आला या काळात एकूण किती जप व्हावा ती संख्या महाराजांवर सोपवून केवळ प्रयत्न जास्तीत जास्त करा हे ध्येय होते. परमार्थात खोटेपणा अजिबात चालत नाही ही महाराजांची शिकवण असल्यामुळे, होणारी जपसंख्या फॉर्मच्या माध्यमातून व्यवस्थित रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवली आणि महाराजांनी अक्षरशः आनंददायी असा वाढत्या संख्येत जप करवून घेतला. झालेल्या जपसंख्येवर नजर टाकली तर हे महाराजांच्या आशिर्वादानेच शक्य झालं हे लक्षात येईल.
इ.स.2016-एकूण जपसंख्या सव्वा सहा कोटी, 2017- सव्वा तेरा कोटी, 2018-पंच्चावन कोटी अकरा लाख, 2019- एकशे अकरा कोटी, 2020 ला कोरोना काळामुळे निश्चित आकडा गोळा होऊ शकला नाही. परंतू ज्ञात आकडा शंभर कोटीहून जास्त झाला. 2021 चा चातुर्मास सध्या सुरू आहे पण यंदा लॉकडाऊनमुळे फॉर्मस् छापता आले नाही. बाकी महाराजांची इच्छा !
या काळात जपाविषयी खूप वेगवेगळे अनुभव गाठीशी जमा झालेत. या लेखाच्या अनुषंगानी एक अनुभव येथे नमूद करता येईल.
एक बँकेतील कर्मचारी आहेत. दर चातुर्मासात आणि अन्यथाही ते भरपूर जप करीत असतात. एका चातुर्मासात ते कॅश काऊन्टरवर होते. आपण बरं, आपलं काम बरं हा त्यांचा स्वभाव. एक दिवस एक माणूस बँकेत येऊन त्याच्याशी विनाकारण वाद करू लागला. तुम्ही माझा अपमान केला, मी मॅनेजरकडे तुमची तक्रार करीन वगैरे. प्रकरण खूप तापलं. मॅनेजरलाही हे कोडंच होतं. कसंबसं प्रकरण थांबलं, तो माणूस निघून गेला. हे काऊन्टरवर परतले. थोडावेळ शांत बसले. सतत महाराजांना म्हणू लागले, महाराज तुम्ही जाणता काय सत्य आहे. मी तर सतत तुमचाच जप करतो आहे. तुम्हीच बघा काय ते ’गणी गण गणांत बोते’.
एक दिवस मध्ये गेला आणि दुपारी तो माणूस पुन्हा येऊन काऊन्टरसमोर उभा झाला. मात्र त्याचा आवेश पूर्ण बदलला होता. तो हात जोडून यांची माफी मागत होता. आग्रहाने यांना मॅनेजरसमोर नेऊन दिलगिरी व्यक्त केली तेव्हाच त्याने बँक सोडली.
नामजपात असे अनुभव येतात. मात्र असं असलं तरी अनुभवासाठी नामजप नसावा तर तो केवळ स्वानंदासाठी असावा. ही परमार्थातील खूणगाठ आपण लक्षात ठेवणं येथे महत्त्वाचं ठरतं.
आपण महाराजांचा जप करावा पण आपण ’गणी गण गणांत बोते’ चा जप करणे कितपत योग्य आहे? उपासकांचा एक प्रश्न.
चातुर्मासात नामजप साधनेच्या काळात अनेक उपासकांनी असा प्रश्न विचारला की आपण महाराजांचं नामस्मरण करणार ठीक आहे पण ’गणी गण गणांत बोते’ हे महाराज म्हणत असत. ते त्याच्या मुखात असणारं वाक्य होतं. आपण ते म्हणणं योग्य होईल? आपण ते का म्हणावं? वास्तविक आता या प्रश्नाचं उत्तर वरील विश्लेषणात आलेलच आहे. परंतू तरीही या प्रश्नावर अधिक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करु.
आपण जेव्हा देवतेचं नामस्मरण करतो तेव्हा कळत नकळत आपण सामान्यतः पुढील तीन गोष्टी करतो. एकतर आपण देवतेला वंदन करतो. नमस्कार करतो. दुसरं म्हणजे आपण आपल्या दैवताचा जयजयकार करतो किंवा तिसरं म्हणजे आपण देवतेचं स्मरण करतो. जसे ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम गं गणपतेय नमः यात आपण वंदन करतो आहे. श्रीराम जय राम जय जय राम, जय श्री कृष्ण यात आपण जयजयकार करतो आहे. पांडुरंग हरी, वासुदेव हरी येथे आपण स्मरण करतो आहे.
’गणी गण गणांत बोते’ असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण मनातून गजानन महाराजांचच स्मरण करीत असतो. लेखाच्या सुरुवातीलाच म्हटलं आहे की ’गणी गण गणांत बोते’ म्हटलं की आठवतात ते गजानन महाराज सततच्या स्मरणामुळे ती देवता आपल्या मनात वास करते, त्यातून चित्त शुद्ध होते आणि कालांतराने नामस्मरण करण्यार्याचं भलं होतं.
हा खचित अनुग्रह केला श्री गजानने तुम्हाला
’गणी गण गणांत बोते’ या मंत्राच्या माध्यमातून महाराजांनी आपणा सर्व गजानन महाराज भक्तांना निश्चितच अनुग्रहीत केलं आहे. त्यामुळे त्या मंत्राच्या उच्चारणातून आपलं भलं होणारच. अनुग्रहीत करणं म्हणजे सद्गुरूंनी शिष्यांना भक्तीचा राजमार्ग दाखविणं. सदगुरूंची प्रसन्नता कशात आहे त्याचा बोध करून देणं त्यामुळे खरं सांगायच तर महाराजांनी बंकटलालचं निमित्त करून आपल्याला दिलेला मंत्र हा खरा महत्त्वाचा आहे! काय म्हणाले महाराज? ’भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहतसे‘ त्यामुळे भाव भक्तीनं महाराजांचं स्मरण करणं महत्त्वाचं आहे. मग तुम्ही महाराजांना वंदन करा, त्यांचं स्मरण करा, अथवा त्यांचा जयजयकार करा भाव-भक्ती त्यामागे असेल तर ते महाराजांना पोहोचणारच कारण ते त्यांचच वचन आहे.
तेव्हा महाराजांचं स्मरण करून ’गणी गण गणांत बोते’ म्हणा त्यांच्या जयजयकारात ओम श्री गजानन महाराज की जय म्हणा, गजानन महाराज की जय म्हणा, श्री गजानन जय गजानन म्हणा, जय गजानन बाबा म्हणा, गजानन माऊली म्हणा किंवा त्यांना वंदन करून ओम नमो भगवते गजाननाय म्हणा हे सर्व त्यांच्या चरणाशी पोहोचण्याची तीव्र इच्छा मनात असणं गरजेचं आहे.बाकी कैवल्याच्या वाटेवर भाविकांना नेण्याची जबाबदारी महाराजांनी स्वीकारलेली आहेच. तेव्हा जयघोष करुन आता थांबू या.
अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज, योगीराज परब्रह्म,
सच्चिदानंद, भक्तप्रतिपालक, शेगावनिवासी समर्थ सद्गुरू
श्री गजानन महाराज की जय ||
जयंत वेलणकर, नागपूर (9422108069)
समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज उपासना केंद्र, नागपूर
........................................
Sri Gajanan Maharaj's holy place in Shegaon must hindu pilgrimage which can give more and more peace to the devoties