गजानन विजय पारायण व आत्मचिंतन
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 3 min read
Updated: Jul 24, 2020
"श्री "
जय गजानन
गजानन विजय वाचन आणि आत्मचिंतन
आपण गजानन विजयचं पारायण करतो, अनेक वेळा केलं आहे. पोथी वाचत असताना कधी कधी मनात अन्य विचार येऊन मन भरकटतं आणि पोथी डोक्यात शिरत नाही. आपलं चित्त पोथीवर स्थिरावून मनात महाराजांविषयीचं चिंतन व्हावं या उद्देशाने हा उपक्रम आहे. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या मनातच द्यायचं आहे किंवा आपली उत्तरे केवळ ईमेलवर पाठवा devleelabhattad@gmail.com.
आपणच आपल्याला मदतरूप ठरून गजानन विजय अधिक चांगल्याप्रकारे समजावून घेणं हा आपला या मागे हेतू आहे. जर प्रश्नाचं उत्तर आलं तर आपला विश्वास वाढेल. न आलं तर आपण अधिक लक्ष देऊन वाचन करू. प्रश्न खूप गहन नाही .त्याचं उत्तर पोथीतच मिळणार आहे.
प्रश्न 1) श्रीगजानन विजय ग्रंथात, संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री गजानन महाराज यांच्यात समान संदर्भात एकत्र उल्लेख कुठे कुठे आला आहे?*
प्रश्न 2) महाराजांनी पुंडलिक भोकरे वर आलेलं गंडांतर टाळलं त्याला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून वाचवलं. पण महाराज असतानाच एवढ्या मोठ्या घटनेला कुणी केवळ योगायोग म्हटलं. कुणी केला असा उल्लेख ?*
प्रश्न 3) गजानन महाराजांचा भक्त, ज्याचा उल्लेख पोथी मधे प्राणांतानंतरही दोन वेळा आला आहे. कोण तो भक्त आणि कुठले ते प्रसंग?
प्रश्न 4) गजानन विजय वाचताना आपल्याला जाणवतं की महाराजांच्या बोलण्यात मिश्किलता होती ( विनोदी पध्दतीने बोलणं) आज आपण अशा चार पाच प्रसंगांची यादी करून पाहू की जिथे महाराजांनी विनोदी पध्दतीने संभाषण केले आहे.
प्रश्न 5) गजानन महाराजांचे दोन भक्त , दोन्ही भक्तांच्या आयुष्यातील फार मोठी घटना, घटनेचा महिना वेगळा
घटनेची तिथी एक
प्रश्न-- ते दोन भक्त कोण , ती घटना कोणती , ती तिथी काय
प्रश्न 6) श्रीगजानन विजय ग्रंथानुसार भक्ती मार्गात कोणत्या गोष्टी विषेश मह्त्वाच्या आहेत?
प्रश्न 7) गजानन महाराजांच्या भक्ताने हताश होऊ नये हा संदेश गजानन विजय मधे कुठे आला आहे?
प्रश्न 8) गजानन विजय ग्रंथामधे लंकेची पार्वती ही उपमा कुणी कुणाला दिली आहे?
प्रश्न 9) संत भूमीवरी सर्वांचं रक्षण करती जरी गुणांप्रमाणे प्रत्येकाशी वागती...असा गजानन विजय मधे उल्लेख आहे. त्या नुसार,पुढे महाराजांनी एका प्रसंगात एका भक्ताशी अध्यात्मिक गुढतेवर बोलणं टाळलं आहे आणि वरून तू यात पडू नको असा सल्ला दिला आहे. महाराजांच्या त्या भक्तांचं नाव काय?
प्रश्न 10) श्री गजानन विजय वाचित असताना, महाराजांच्या आशिर्वादाने ग्रंथाच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न केला तर, गजानन महाराजांच्या आशिर्वादाने अधिकच बहरलेली दासगणूंची प्रतिभाशक्ती शब्दागणिक आणि ओवीगणिक जाणवते आणि लक्षात येतं,अशा कित्येक ओव्या आहेत की ज्यांचं विश्लेषण म्हणा किंवा रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला तर त्यामागे असलेल्या विविध छटा मनाला जाणवून जातात. वानगीदाखल एक ओवी इथे मांडतो. गोष्टीचा संदर्भ लक्षात घेता त्यातून काही वेगळ्या छटा तुम्हाला जाणवतात का?त्या ओवीच्या अंतरंगात शिरलो तर एकाच ओवीतून किती वेगवेगळ्या गोष्टी दासगणू सांगून जातात हे काही जाणवतं का बघा यावर विचार करा.
(अध्याय पंधरा/श्रीधर काळे) पश्चिमेचा मावळला/ तोच पुर्वेकडे आला/ विचार सूर्य त्याचा भला
प्रश्न 11) भास्करपाटलाने ब्रम्हगिरी गोसाव्याचा कोणता हात पकडला ?
प्रश्न 12) श्रीगजानन विजय ग्रंथानुसार बंकटलालाकडे लक्ष्मी कोणत्या कारणामुळे स्थिरावली?
प्रश्न 13) श्रीगजानन विजय ग्रंथानुसार अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे असे वर्णन कुठे आणि कुणाच्या संदर्भात आले आहे?
प्रश्न 14)श्रीगजानन विजय ग्रंथानुसार बंकटलालालाचे वंशज अजुनही कोणतं व्रत करतात?
प्रश्न 15) श्रीगजानन विजय ग्रंथात श्रीस्वामी समर्थांचा उल्लेख कुठे आला आहे?
प्रश्न 16) गजानन महाराजांनी सुकलाल अग्रवालची द्वाड गाय गरीब केल्याचं आपण वाचतो. गजानन विजय मधे असे अनेक प्रसंग आहेत की जिथे बैलगाडी अथवा बैलांशी महाराजांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आला आणि चमत्कार घडला. यावर आपण विचार केला आहे का? असे किती प्रसंग आपल्याला आठवतात?
प्रश्न 17) गजानन विजय ग्रंथानुसार त्या काळी शेगांवला आठवडी बाजार कोणत्या वारी भरत असे, तो वार कोणता?
प्रश्न 18) गजानन विजय ग्रंथात पहिल्या अध्यायात रामचंद्र पाटील यांचा उल्लेख आहे नंतर अध्याय वीस व अध्याय एकवीस मधे त्यांचा पुन्हा उल्लेख आला आहे. मात्र त्या आधी पोथीत त्यांचा ओझरता अगदी थोडक्यात उल्लेख आला आहे. कुठे, केव्हा?
प्रश्न 19) गजानन विजय ग्रंथात पाटील कुळातील अनेकांचा उल्लेख आहे. सर्व प्रथम कुणाचा उल्लेख आला आहे?
गजानन विजय ग्रंथ अधिक चांगला समजण्यात आपलीच आपल्याला मदत व्हावी या शुध्द हेतूने हे प्रश्न होते. आपण 19 प्रश्न पाहिले आहेत, कृपया आपली उत्तरे केवळ ईमेलवर पाठवा devleelabhattad@gmail.com .
या उपक्रमातून एक जाणवलं की आपली किती पारायणं झालीत हे महत्वाचं आहेच पण पारायण कसं झालं हेही तितकेच महत्त्वाचे आहे. नाही का? आपला उद्देश आत्मचिंतन हा होता. यातून तो कितपत साध्य झाला हे ठरविण्याचा आधिकार आपला आहे. एकूण उपक्रमातील या प्रश्नोत्तरांचा उपयोग आपण गजानन विजय वाचकांच्या हितार्थ सहर्ष करू शकता. अन्य काही सूचना हितगुज या साठी स्वागत आहेच.
Comments